HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोरोनाची तिसरी-चौथी लाट मुद्दाम आणली जात आहे’, राज ठाकरेंचा आरोप

मुंबई | राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा धोका सरकारने दिला आहे. त्यामुळे सरकारने अजून सारे निर्बंध शिथिल केलेले नाहीत, यावरून आज(३१ ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ‘दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट ही मुद्दाम आणली जात आहे. हे म्हणजे लॉकडाऊन आवडे सरकारला.’ असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईत ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सरकारने दहीहंडी आणि इतर उत्सवावर निर्बंध घातल्याने जोरदार टीका केली आहे.

लॉकडाऊन आवडे सरकारला

लॉकडाऊन आवडे सरकारला असं झालं आहे. माझं तर म्हणणं आहे की, ही जी दुसरी, तिसरी लाट, चौथी लाट मुद्दाम आणल्या जात आहेत. आता नारायण राणेंविरोधात यांच्या ज्या हाणामाऱ्या सुरु आहेत त्या चालतात यांना. मी तो व्हीडिओ बघितला. त्यात भास्कर जाधव यांचा मुलगा मंदिरात पूजा करतोय. यांच्यासाठी मंदिरं सुरु मग सामान्य लोकांसाठी का बंद? म्हणून मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं की, जोरदार दहीहंडी साजरी कसा सांगितलं.’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचे आदेश मनसैनिकांना दिले

एकीकडे राज्य सरकारने दहीहंडी उत्सवावर बंदी घातलेली असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी मात्र दहीहंडी जल्लोषात साजरी करण्याचे आदेश मनसैनिकांना दिले होते. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘यांना जन आशीर्वाद यात्रा चालते, यांचे मोठमोठे मेळावे भरतात. तेव्हा यांचा लॉकडाऊन नसतो. पण आमचे सण आले की, यांचा लॉकडाऊन असतो. म्हणून मी म्हटलं दहीहंडी साजरी करा. जे होईल ते होईल.’

आमची मंदिरं उघडली गेलीच पाहिजे

‘आमची मंदिरं उघडली गेलीच पाहिजे. आजचा हा दिवस होऊन जाऊ दे. याविषयी मी आमच्या लोकांची बैठक घेणार आहे. मंदिरी उघडली नाहीतर आम्ही मंदिरांबाहेर घंटानाद करु. माझं म्हणणं आहे, नियम लावायचा तर सगळ्यांनाच लावा तो देखील सारखाच.’ असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सगळं सुरु झालं आहे, पण मंदिरं मात्र बंद

राज्यात अजूनही देऊळं बंद आहेत, परंतु शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा मंदिरात अभिषेक करतानाचा विडिओ व्हायरल झाला आहे. यावरून देखील राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. . ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात पूजा केली तर चालते. मंदिर बंदचा नियम फक्त आम्हाला. आता तुम्ही पाहिलं असेल की, सगळं सुरु झालं आहे. पण मंदिरं मात्र बंद.’ असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारच्या मंदिर बंद नियमाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का?

राज ठाकरे यांनी सरकारवर निर्बंधांवरून हल्ला चढवला आहे. कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जन आशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणांतून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढं सुरू करतात, अशी टीका राज यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला,” पोलिस आयुक्तांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबाजुने सर्व सदस्य एकवटले…

News Desk

धक्कादायक ! ‘लॉकडाऊन’मुळे वाहन न मिळाल्याने दुचाकीवरुनच वडिलांचा मृतदेह घरी नेला

swarit