HW News Marathi
मनोरंजन

असीमला औरंगजेब पुन्हा भेटलाच नाही

साऱ्या जगात शनिवारी ईद उत्साहात साजरी झाली. पंधरा वर्षाचा असीमही खूप आतुरतेने ईदची वाट बघत होता. त्याचा भाऊ औरंगजेब त्याच्यासाठी उपहार घेऊन येण्याचा आनंद त्याला ईदपेक्षाही जास्तच झाला होता. पण, जेव्हा औरंगजेब शवपेटीतून त्यांच्या दाराशी आला तेव्हा सगळ्यांच्या भावनांचा बांधच फुटला. आपला भाऊ दहशतवादी संघटनांचा कर्दनकाळ ठरला. दहशतवाद्यांना मोठ्या धैर्य आणि शौर्याने यमसदनी धाडले यामुळे असिमचा ऊर जाज्वल्य अभिमानाने भरून आला होता. त्याचे मित्रही त्याला म्हणत होते की तुला ईदचा आनंद कमी आणि औरंगजेब येणार याचाच आनंद खूप झालेला आहे. असीमही त्याच्या भाई अन वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवणार आहे. सैन्यात जाऊन दहशतवादी तुकड्यांना फाडून खाण्याचे त्याचे ध्येय्य आहे.

असीम डोळ्यात तेल घालून औरंगजेबची वाट बघत होता. त्या घरावर एकाएकी दुःखाची काळी छाया पसरली. औरंगजेबचे शव आल्याने सगळ्यांचाच ईदच्या आनंदावर विरजण पडले. वर्षाचा सण असतो ईद. जशी दिवाळी तशीच ईद. यावेळी नवीन कपडे, खाऊ, भेटवस्तू आणि आनंद या सगळ्यांनी घर भरून जात असते. औरंगजेबच्या घरी मात्र ही ईद फक्त दुःखांचे डोंगर कोसळवणारी ठरली. ईदच्या मिठाईत कडवटपणा आला. तर कपड्यांची शान उडून गेली. शवपेटीत निपचित पडलेला औरंगजेब बघून त्याच्या घरात, गावात ऊर बडवत टाहो फोडले गेला. साऱ्या गावावर त्याच्या शहीद होण्याने सुतक पडले.

असीम आता आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना म्हणतो, त्याला कुठलीच भेट नकोय. त्याचा भाऊ मात्र परत हवा आहे. औरंगजेबने वचन दिले होते की तो घरी येताना त्याला नवीन कपडे, खाऊ, क्रिकेटची बॅट घेऊन येणार. तो आला तेच मुळी शवपेटीतून, औरंगजेबला मिठीत घ्यायची असिमची इच्छा आहे. तो मात्र निष्प्राण झाला आहे. त्याला कोणती भेटवस्तू नको, त्याचा भाऊ फक्त परत हवा आहे. आपल्या आयुष्यात सुख, दुःख आणि संघर्ष काळात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा आपला भाऊच असतो. आपलं काही चुकलं तर ती सुधरवून सांगणारा, तोंडभरून कौतुक करणारा, आपला सगळ्यात जवळचा मित्र हा भाऊच असतो. मोठा असेल तर वडिलांच्या नंतर भाऊबद्दलच कुणालाही आदर, धाक वाटत असतो. असिमचा हा धाक आता कायमचा गेला. असीम तरीही स्वतः सैन्यात भरती होण्याची तयारी करायला लागला आहे.

असीमचे औरंगजेबशी शेवटचे बोलणे अतिरेकी त्याचं अपहरण करत असताना झाले होते. औरंगजेब पुंछला येत असताना माझ्याशी बोलत होता. त्याला कुणीतरी अडवत होते. आम्हाला वाटलं ते तपासणीचे पथक असेल, वाटलंच नव्हतं की दहशतवादी त्याचे अपहरण करणार होते. असिमशी बोलल्यानंतर काही तासानंतरच औरंगजेबच्या शरिराची चाळण केली. त्यानंतर त्याला गुस्सु गावात फेकून दिले. त्याचे अपहरण झाले तिथून हे ठिकाण दहा किलोमीटर इतके दूर आहे. दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्याद्वारे हिजबुलच्या दहशतवादी त्याची लष्करी हालचालींच्याबद्दल चौकशी करताना दिसून आले.

शनिवारी शासकीय इतमामात औरंगजेबचे दफन केले गेले. यावेळी त्याच्या नातेवाईकांचा मोठा आक्रोश होता. त्याचे कुटुंब आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. जम्मू-काश्मीर, केंद्र सरकारकडे त्यांनी घाटात उतरून दहशतवादी संघटनांचा खात्मा करण्याची मागणी केली आहे. औरंगजेबच्या वडलांनी, मोहम्मद हनिफ यांनी सांगितले. माझ्याकडून पीएम मोदी यांना ७२ तासांची अवधी दिला आहे. जम्मू काश्मीरमधून त्यांनी दहशतवाद्यांचा तत्काळ खात्मा करावा. शहीद औरंगजेबला न्याय द्यावा. त्यांनी तसे न केल्यास ते स्वतः असे करण्यास समर्थ आहेत. काश्मीर आमचे आहे. त्याला आम्ही असेच जळू देणार नाही. मोहम्मद हनिफ हे भारतीय सैन्यात शिपाई होते. त्यांचा मुलगा असिफ हा पण सैन्यात भरती होण्याची तयारी करतो आहे. वडील, भावाप्रमाणेच देशाची सेवा करण्यासाठी सीमेवर लढण्याची तो तयारी करत आहे.

औरंगजेब अवघ्या २४ वर्षांचा होता. हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी समीर टायगर याला मृत्यूच्या दाढेत ढकलण्यास तोच जबाबदार होता. मेजर रोहित शुक्ला यांच्या तुकडीत औरंगजेब होता. औरंगजेबची नियुक्ती ४४ राष्ट्रीय रायफल तुकडीत झालेली होती. तो काश्मीरचा रहिवासी होता. मागच्या आठवड्यात त्याचे अपहरण केल्यावर त्याला काही प्रश्न विचारले.यानंतर त्याला ठार केले गेले. त्याचे अपहरण केले तेव्हा तो खासगी वाहनाने घरी जात होता. कलामपोराला पोहोचताच दहशतवाद्यांनी त्याची गाडी अडवली. त्याला त्यांच्यासोबत घेऊन गेले. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी पुंछ येथे औरंगजेबच्या घरच्यांची भेट घेतली. रमजानच्या महिन्यात असलेली शस्त्रसंधीवरील बंधन मुक्त केल्यानंतर ही भेट घडल्याचे समजते.

औरंगजेबला ठार केल्यानंतर आता जैश-ए-मोहम्मद यांच्या निशाणा मेजर रोहित शुक्ला यांच्यावर असू शकतो. औरंगजेब याच्या हत्येचा आठ महिन्यापासून शिजत असलेला कट यशस्वी झाल्याने पुढील लक्ष्य मेजर शुक्ला असतील. अशी खबरबात लष्कराच्या गोपनीय सूत्रांनी दिली आहे. औरंगजेबने ज्या दहशतवाद्याला कंठस्नान घातले त्या मिशनचे सूत्रधार मेजर शुक्ला हे होते. काश्मीरातील दहशतवाद्यांना भयभीत करून सोडणाऱ्या मेजर शुक्ला यांच्या सुरक्षिततेत मोठी वाढ करणे गरजेचे आहे. जैशला ठाऊक आहेच जोपर्यंत त्यांच्या सुरक्षेत औरंगजेबसारखे शूरवीर, नरहर तैनात असतील तोपर्यंत शुक्ला यांच्या केसालाही धक्का लावणे शक्य नाही. पुलवामा येथून औरंगजेबचे अपहरण आणि हत्या केवळ दहशतवादी कारवाई नव्हती तर अत्यंत थंड डोक्याने केलेला खूनच होता. पाकिस्तानात बसून जैश ए मोहम्मदच्या मुख्य दहशतवादी आका मसूद अजहर याने हा कट रचला होता. आका अजहर याने सैन्याच्या एका रायफलमनशी बदला घेण्यासाठी तब्बल आठ महिन्यांपासूनची योजना आखली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. मशहुर गुलाटीला स्वाइन फ्लू

News Desk

लोककला जिवंत ठेवण्यासाठी अनोखा उपक्रम

News Desk

राज ठाकरे यांची कन्या बॉलवूडमध्ये!

News Desk