HW News Marathi
महाराष्ट्र

यशवंत जाधवांच्या डायरीतल्या ‘मातोश्री’ उल्लेखावर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण

रत्नागिरी | शिवसेना उपनेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने गेल्या महिन्यात छापा टाकला होता. त्यानंतर मुंबईत मोठी खळबळ उडाली असून तेव्हापासून आतापर्यंत यशवंत जाधव प्रकरणी रोज नव्या घटना समोर येत आहेत. तसेच आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांची काही संपत्ती सुद्धा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एका चर्चेला जोर आला आहे, ते म्हणजे यशवंत जाधवांच्या घरातून सापडलेल्या डायरीमध्ये मातोश्रीवर दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपये दिल्याचाही उल्लेख आहे. तर आता यावरून शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे आज (मंगळवार, २९ मार्च) रत्नागिरी दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचबरोबर त्यांनी यशवंत जाधवांकडे सापडलेल्या डायरी संदर्भातही प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी राज्यात  हे घाणेरडं राजकारण सुरू आहे. हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी योग्य नाही. त्यामुळे हे घाणेरडं राजकारण तातडीने थांबलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे. तसेच नैराश्यातून असे प्रकार होत असतात, असंही ते म्हणाले.

दरम्यान, यशवंत जाधवांकडे सापडलेल्या डायरीत मातोश्रीला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घड्याळ दिले असल्याची नोंद माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. यावरूनच भाजप शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. कारणठाकरे कुटुंब राहत असलेल्या घराला सुद्धा ‘मातोश्री’ म्हणून ओळखलं जातं. मात्र, यशवंत जाधवांनी हा आरोप फेटाळून लावला असून डायरीतील ‘मातोश्री’ हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचं स्पष्टीकरण यशवंत जाधवांनी आयकर विभागाला दिलं आहे. डायरीतील ‘मातोश्री’च्या उल्लेखाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की,  अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं हे महत्त्वाचं आहे. सध्या किती अफवा पसरवल्या जात आहेत हे सर्वच जण पाहत आहेत. इतरांकडून फिडिंग येते आणि त्या अफवांच्या बातम्या होतात. अफवा पसरवून यंत्रणांचा वापर बदनामीसाठी केला जातो आहे, हे राजकीय षडयंत्र आहे. त्यामुळे त्या खोलात मी नाही जाणार, असं ते म्हणाले.

तसेच ज्या अधिकृत गोष्टी आहेत त्या बाहेर येतीलच. पण अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही. हे घाणेरडे राजकारण थांबले पाहिजे, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं आहे. तर भविष्यात भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, तुम्हीच ठरवा की जर कोणी तुम्हाला सतत नाहक त्रास देत असेल तर तुम्ही काय कराल? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दरम्यान, काल शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीतील नाराजी व्यक्त केली. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार हे विकासासाठी आहे. यामध्ये काही नेत्यांमध्ये थोडी खदखद होते, नाराजी असते. नाराजी साहजिक असते, पण ती दूर करण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. तर आघाडीतून बाहेर पडण्याबाबतचं तानाजी सावंत यांचं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, असंही ते म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेणू शर्मा आणि धनंजय मुंडेंचा जबाब मुंबई पोलीस नोंदवण्याची शक्यता

News Desk

कोरोनासंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक;, नव्या विषाणूवर होणार चर्चा

News Desk

विकासकामांमध्ये महाराष्ट्राला कायम पुढेच ठेवू! – अजित पवार

Aprna