HW News Marathi
महाराष्ट्र

जरंडेश्वर साखर कारखाना जप्ती, अजित पवारांनी खोडून काढले सर्व आरोप

पुणे | साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता ईडीनं सील केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे अडचणीत आल्याची चर्चा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत सर्व आरोपांना उत्तरं दिली.’जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची विक्री झाली आहे. कारखाना व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळं कारखान्याचं संचालक मंडळ ईडीच्या कारवाईला न्यायालयात आव्हान देईल,’ असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

जरंडेश्वर साखर कारखाना हा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. जरंडेश्वर कारखान्यानं बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याच्या तपासातून समोर आलं आहे. त्या आधारेच ईडीनं जप्तीची कारवाई केली आहे. हा कारखाना आधी सहकारी स्वरूपाचा होता. मात्र नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन खासगीकरण झालं होतं. अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून कारखाना बळकावल्याचा आरोप केला जात आहे.

या सगळ्या आरोपांना अजित पवार यांनी उत्तरं दिली. ‘हा कारखाना माझ्या नातेवाईकांचा आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही. माझ्या माहितीनुसार कायदेशीर प्रक्रियेनुसारच या कारखान्याची विक्री करण्यात आली आहे. कर्ज थकविणाऱ्या कारखान्यांच्या विक्रीचा निर्णय कोर्टाचाच होता. संचालक मंडळानं हा कारखाना विकलेला नाही. कोर्टानं विक्रीला काढलेला कारखाना कोणी बळकावू शकतं का?,’ असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला.

‘जरंडेश्वर कारखाना खरेदीसाठी १२ ते १५ कंपन्यांचं टेंडर आलं होतं. गुरू कमोडिटीनं सर्वात जास्त बोली लावली होती. हा कारखाना सर्वाधिक किंमतीला विकला गेला होता. याउलट राज्यातील इतर कारखाने खूप कमी किंमतीला विकले गेले आहेत. मराठवाड्यातील एका कारखान्याची क्षमता जरंडेश्वर कारखान्याइतकी असतानाही तो कारखाना अवघ्या चार कोटींमध्ये विकला गेला. शिवाय, कारखाना विकत घेणारे सर्व पक्षांचे लोक आहेत. काही खासगी व्यक्तीही आहेत. त्यामुळं विक्रीमध्ये घोटाळा झाला असं कोणी म्हणत असेल तर तो घोटाळा नेमका काय आहे हे सांगावं,’ असं आव्हान अजित पवारांनी दिलं.

‘मागच्या सरकारच्या काळात सीआयडी चौकशी झाली. एसीबीनं चौकशी केली होती. काहीही निष्पन्न झालं नाही. ईडीनं आता कोणत्या आधारे चौकशी सुरू केलीय माहीत नाही. त्याबाबत कारखान्याचं व्यवस्थापन न्यायालयात जाईल,’ असं ते म्हणाले.’तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा अधिकार आहे. फक्त चौकशी पारदर्शक व्हावी. त्यामागे कुठलाही वेगळा हेतू नसावा. पण देशात सध्या काय पद्धतीचं राजकारण चाललंय हे सर्वांनाच माहीत आहे,’ असं सूचक वक्तव्यही अजित पवार यांनी केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही! – राज ठाकरे

Aprna

कोल्हापुरात पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या गावातील नागरिकांचे केले स्थलांतर

News Desk

सुट्टी सिगारेट विकण्यावर राज्य सरकारची बंदी

News Desk