HW News Marathi
महाराष्ट्र

मोफत लसीकरणाच्या घोषणेवर काँग्रेसची नाराजी, राष्ट्रवादी-सेनेला थोरातांनी सुनावलं

मुंबई | केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षांच्या पुढील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. यादरम्यान अनेक राज्यांनी मोफत लसीकरण केलं जाईल असं जाहीर केलं असून महाराष्ट्र सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा किंवा निर्णय घेतलेला नाही. राज्य पातळीवर कोणताही निर्णय झालेला नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र मोफत लसीकरणाची घोषणा केली. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील ट्विट केलं होतं. पण नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. यावरुनच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यावरुन नाराजी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केली आहे.

“मोफत लसीकरणावर आमची भूमिका स्पष्ट आहे. सोनिया गांधी यांनी तसं सांगितलं असून लस मोफत दिली पाहिजे असा आग्रह धरला आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आग्रह धरला असून मान्य होईल अशी आशा आहे. मुख्यमंत्री यावर विचार करत असताना श्रेय घेण्यासाटी कोणी जाहीर करतं हे आम्हाला आवडलं नाही, काँग्रेस म्हणून आमची नाराजी आहे,” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

“लस उपलब्ध होणं आणि त्यासाठी जास्त केंद्रं उभारणं यासंबंधी धोरण आखावंच लागले. ४५ च्या पुढील नागरिकांच्या लसीकरणावेळी गर्दी होत असताना १८ च्या पुढील सर्वांना लस देताना गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये गोंधळ होऊन करोना प्रसार वाढेल. लस उपलब्ध करून देणं केंद्राची जबाबदारी असून दोन दिवसात धोरण निश्चित केलं जाईल,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्येही प्रत्येक पात्र नागरिकाला केंद्र सरकार मोफत लसीकरण उपलब्ध करुन देणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे राज्यांवर याचा भार नाही. एखाद्या राज्याला वेगाने लसीकरण करायचं असल्यास बाजारात लस उपलब्ध आहेत. परंतू १०० टक्के भारतीयांकरिता केंद्र सरकारने व्यवस्था निर्माण केली असून लसीकरण होणार आहे. आता वेगवेगळी वक्तव्यं का केली जात आहेत. ट्विट डिलीट का केली जात आहेत याची मला कल्पना नाही. पण पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट केली आहे,” असं सांगत फडणवीसांना राज्य सरकारवर निशाणा साधला.

काय आहे प्रकरण?

केंद्र सरकारने १ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५ पेक्षा कमी वय असलेल्यांना केंद्र सरकार लसपुरवठा करणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर अनेक राज्यांनी १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. तर दोनच दिवसांपूर्वी राज्यातील लसीकरणाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असेही अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर मोफत लस देण्याचा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जाहिर केले होते.

मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्या बैठकीतही मोफत लस देण्याच्या निर्णयावर एकमत झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याला होकार दिला होता. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर निविदा काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. त्यांनतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोफत लसीकरणाचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती ट्वीटच्या माध्यमातून दिली. मात्र नंतर त्यांनी हे ट्वीट मागे घेत लसीकरणाबाबत उच्चस्तरीय समिती निर्णय घेईल, त्यासाठी थोडा वेळ प्रतीक्षा करू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बागायती क्षेत्राच्या हस्तांतराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पवार साहेबांचा एक फोन पुरेसा – बाळासाहेब थोरात

News Desk

एसटी कर्मचाऱ्यांना भोजनभत्ता देण्यात यावा, अनिल परब यांचे निर्देश

News Desk

घाबरलो नाहीत आणि घाबरणारही नाही, राहुल गांधींचं आवाहन

News Desk