HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद आता राज ठाकरेंच्या दारी, विमानतळासाठी सुचवलं ‘हे’ नाव

नवी मुंबई | नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारले आहे. तर शिवसेनेनं विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्धार केला आहे. त्यात कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील बाळासाहेबांच्या नावावर ठाम असल्यानं बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर आज (२१ जून) नवी मुंबईचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकुर आणि महेश बालदी आज मुंबईत ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

भाजपचे आमदार प्रशांत ठाकुर आणि विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी केलेली आहे. तर शिवसेनेनं बाळासाहेबांचं नाव देण्यावर ठाम भूमिका घेतल्यानं वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच मुद्द्यावरुन प्रशांत ठाकुर आज राज ठाकरेंच्या भेटीसाठी आले आहेत.

नवी मुंबईतील विमानतळालादेखील शिवरायांचंच नाव दिलं जावं

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याबाबत स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन पुकारलं आहे. तर शिवसेनेनं विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर राज यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. ‘मुंबईत विमानतळाला असलेली जागा कमी पडू लागली आहे. त्यामुळे नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला आणि देशांतर्गत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबईतील विमानतळालादेखील शिवरायांचंच नाव दिलं जावं,’ असं राज ठाकरे म्हणाले.

‘बाळासाहेब ठाकरे आदरणीय आहेतच. दिवंगत दि. बा. पाटील ज्येष्ठ नेते होते. पण नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचाच भाग आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मुंबईत जागा नसल्यानं नवी मुंबईत विमानतळ उभारलं जात आहे. त्या विमानतळाचा आंतरराष्ट्रीय कोडदेखील मुंबई विमानतळाप्रमाणेच BOM असा असणार आहे. त्यामुळे त्या विमानतळाला छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात यावं,’ अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

‘महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. परदेशातून येणारा माणूस हा शिवरायांच्या भूमिकेत येत असतो. त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव संयुक्तिक असेल. आज बाळासाहेब असते, तर त्यांनी स्वत:देखील शिवरायांचंच नाव विमानतळाला देण्याचा सल्ला दिला असता. विमानतळाला शिवरायांचं नाव दिलं जाणार असेल तर कोणाचाही त्याला विरोध नाही. स्थानिकदेखील त्याला विरोध करणार नाहीत, असं प्रशांत ठाकूर यांनी मला सांगितलं आहे,’ असं राज म्हणाले.

आता बघू कोण विरोध करतं, राज ठाकरे गरजले

विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्या, अशी मागणी शिवसैनिकांची आहे. त्यांचा दि. बा. पाटील नावाला विरोध आहे, त्याबद्दल काय वाटतं, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर छत्रपती शिवरायांचं नाव देण्यात यावं, ही माझी भूमिका आहे. आता बघू कोण विरोध करतं, अशा शब्दांत राज ठाकरे गरजले.

कृती समितीच्या ठरावाला मुख्यमंत्र्यांनी दिली बगल

लोकनेते दिबा पाटील आंतराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत दिबांच्या नावाला पाठिंबा दर्शविणारे स्थानिक ग्रामपंचायती तसेच विविध प्राधिकरणाचे ठराव मुख्यमंत्र्याना सादर केले होते. या ठरावांची देखील दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. विशेष म्हणजे तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतल्यास शिवसैनिक देखील रस्त्यावर उतरतील अशी भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरल्याने अशाप्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांनी वापरल्याचा आरोप आमदार प्रशांत ठाकुर यांनी केला आहे. कृती समितीच्या माध्यमातुन येत्या २४ तारखेला सिडकोला घेराव घालण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे.

नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जाणार असल्याचं नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. भविष्यात दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला दि. बा. पाटलांचं नाव दिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी संघर्ष समितीला दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

प्रकल्पाग्रस्तांचे नेते दि.बा पाटील यांचं नाव द्या

सिडकोने नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठविल्यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेनाप्रमुखांविषयी आदर आहे, त्यांचे नाव राज्यातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रकल्पाला देता येईल, परंतु नवी मुंबईमधील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी आग्रही भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करून आंदोलन सुरू केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

द्रोह करणाऱ्या ‘त्या’ पोलिसांची नावे जाहीर करा, अटक करा अन्यथा…!

News Desk

महाविकास आघाडीतील ८ आमदार नाराज, मुंबईत राजकीय हालचालींना सुरूवात

News Desk

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान

Aprna