HW News Marathi
महाराष्ट्र

‘संभाजी राजेंसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळात कोणकोणते नेते?’

मुंबई | मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकीकडे मराठा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांचं एक शिष्टमंडळ असणार आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप नेत्यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रपतींसमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज आणि समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. त्यानुसार आज ही भेट होणार आहे.

संभाजीराजे आणि शिष्टमंडळातील अन्य नेत्यांची एक बैठक पार पडली

संभाजीराजे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्षांना आपले प्रतिनिधी पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राजकीय पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले प्रतिनिधी पाठवले आहेत. त्यात शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीपूर्वी संभाजीराजे आणि शिष्टमंडळातील अन्य नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती संभाजीराजे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

भेटीत कुठले मुद्दे मांडणार?

यावेळी राष्ट्रपतींना एक निवेदन देण्यात येणार आहे. मराठा समाजाची स्थिती, त्यांना आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घडामोडी, मराठा आरक्षणातील कायदेशीर पेच आदी बाबी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिल्या जाईल. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी राष्ट्रपतींना विनंती केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज

संभाजीराजे हे सुरूवातीपासून मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय आहेत. रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय हेव्यादाव्यांच्या पलिकडे जाऊन संभाजीराजे मोट बांधत आहेत.

राष्ट्रपतींच्या भेटीकडे सर्व राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागून राहिले

संसदेत 127 व्या घटनादुरूस्तीवर बोलत असतानाही संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकारची जबाबदारी स्पष्ट केली. या घटनादुरूस्तीनंतर मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागास ठरवून असाधारण परिस्थिती सिद्ध करून 50% च्या वरती आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह खासदार संभाजीराजे घेत असलेल्या राष्ट्रपतींच्या भेटीकडे सर्व राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समीर वानखेडेंचा नवा फोटो ट्विट करत नवाब मलिकांनी दिला सूचक इशारा

News Desk

दिल्लीच्या वरद हस्तामुळेच प्रकाश मेहतांचा बचाव

News Desk

वसई दरड दुर्घटना: मृतांना प्रत्येकी ६ लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna