HW News Marathi
Covid-19

मला लष्कराची अजिबात गरज नाही, माझा प्रत्येक नागरिक सैनिक

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. सुरुवातीला त्यांनी कालच्या बैठकीवेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून सरकारच्या सोबत असल्याचे सांगितले. इतर पक्षाच्या नेत्यांनी काही बाबी निदर्शनास आणून दिल्या. आणि सगळेजण एकत्र मिळून या कोरोनाशी लढत आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच, आज औरंगाबाद येथे झालेल्या अपघातात ज्या मजुरांचा मृत्यू झाला त्या घटनेने मी व्यथीत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्य सर्व मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. इतर राज्यांसोबत मजुरांच्या स्थलांतराबंतीत चर्चा सुरू आहे. आणखी ट्रेन सोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे मजुरांनी कोठेही जाऊ नका, आहात तेथे सुरक्षित थांबा. राज्य सरकार तुम्हाला तुमच्या घरी पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व मजुरांना दिले.

गेल्या अनेक दिवसांपासून अशी अफवा येत होती की मुंबईमध्ये लष्कर येणार. तर ही पूर्णपणे अफवा आहे. कारण माझा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे, असा धीर त्यांनी यावेळी जनतेला दिला. तसेच, कोरोनाच्या या युद्धकाळात डॉक्टर, पोलीस तणावाखाली काम करत आहेत. काही पोलिसांना, डॉक्टरांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे त्यांना देखील आरामाची गरज असल्याचे यावेळी मुख्मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे मनुष्यबळ लागल्यास केंद्राकडून मागवू मात्र लष्कर मुंबईत येणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या लाईव्ह संवादातील महत्वाचे मुद्दे:

* मुंबईत लष्कर येणार ही अफवा, जे करेल ते तुम्हाला सांगून करेल, मुंबईत लष्कराची गरज नाही, ते मुंबईत येणार नाही.
* संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे, सर्व उपाययोजना करत आहोत,
* बीकेसीमध्ये कोव्हिड रुग्णालय उभं राहात आहे, ते दुपटीने वाढवू, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करु.
* सर्व यंत्रणा तणावाखाली आहेत, पोलीस यंत्रणेतील अनेकजण आजारी पडले, काहींचा मृत्यू झाला, त्यांना विश्रांती देण्याची गरज आहे,
* सर्व यंत्रणांवर ताण आहे, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत, त्यांना विश्रांती देण्यासाठी मनुष्यबळ लागलं तर केंद्राकडून मागू, पण त्याचा अर्थ लष्कर बोलवू असं नाही.
* बाहेरच्या राज्यातील आपल्या लोकांना आणणार आहोत, पण सर्व काही मोजून मापून करणार आहोत,
* रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये अजूनही केसेस सापडत आहेत, तिथे शिथिलता इतक्यात शक्य नाही, लॉकडाऊन हा गतीरोधक आहे, पण चेन तोडायला अद्याप यश नाही.
* लॉकडाऊन कितीवेळा वाढवायचा? आपल्याला चेन तोडण्यात यश आलेलं नाही, ते यश मिळवायचं आहे.
* पोलिसांना विश्रांती देण्यासाठी केंद्राकडून अधिकच्या मनुष्यबळाची मागणी करणार, नंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने पोलिसांना तैनात करु, याचा अर्थ लष्कर बोलावलं असा नाही.
* मुंबईतील टेस्ट सुरुच राहतील, राज्यात सर्वाधिक टेस्ट होत आहेत, शेवटच्या टप्प्यात रुग्ण आल्यावर उपाय कमी पडतात.
* कोरोनाची साखळी तोडण्याची वेळ आहे, अनेक रुग्ण उशिराने समोर येत आहेत, त्यामुळे सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं असतील तर स्वतःहून पुढे येऊन तपासणी करा, घाबरु नका.
* राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहेच, पण बरे होणाऱ्यांचंही प्रमाण अधिक आहे, सव्वातीन हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले.
* औरंगाबादची दुर्घटना अत्यंत वेदनादायी, मजुरांनी संयम बाळगावा. रुग्णालयांमध्ये गलथानपणा चालणार नाही, आमच्यावर कारवाईची वेळ आणू नका, सर्व व्यवस्थित असताना गलथानपणा चालणार नाही.
* मी आयुष डॉक्टरांनाही आवाहन करतोय, त्यांनी मदतीसाठी पुढे यावं, तुम्हा सर्वांची महाराष्ट्राला गरज आहे. आयुर्वेदीक डॉक्टरांनीही सहभागी व्हावं.
* लॉकडाऊन वाढवण्यात कुणाला रस नाही, पण प्रत्येकाने शिस्त राखणं आवश्यक आहे, माझा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे.
* आपल्याला सामाजिक अंतर ठेवायचं नाही, तर शारिरीक अंतर ठेवायचं आहे, म्हणूनच मी फिजीकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरला

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने कोरोना वॉरियर्सचा सन्मान, जगासोबत कोणताही स्वार्थ न ठेवता उभा !

News Desk

ही सेवा महाराष्ट्र अन् शिवरायांच्या चरणी रूजू झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यू दर वाढल्याने पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांत होणार चर्चा!

News Desk