HW News Marathi
महाराष्ट्र

“प्रिय देवेंद्रजी तुम्ही हे कसं विसरू शकता की…”, राऊतांनी फडणवीसांना करून दिली ‘ती’ आठवण!

मुंबई | राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहातील अभूतपूर्व गोंधळानंतर व अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, गैरवर्तनचा ठपका ठेवत भाजपाच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन करण्यात आले. या कारवाई विरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

कालच भाजपाच्या १२ आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट देखील घेतली व ही एतर्फी कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. तसेच, आज (६ जुलै) भाजपाने विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली असून, १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात आता भाजप उच्च न्यायालयात देखील जाणार आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना एक विशेष आणि महत्वाची आठवण करून दिली आहे.

काय आहे संजय राऊतांचं ट्विट?

“गैरवर्तन केल्याप्रकरणी १२ आमदारांना निलंबित करण्यात आल्याबद्दल भाजपा निषेध व्यक्त करत आहे. प्रिय देवेंद्रजी तुम्ही हे कसं विसरू शकता की, याच सभागृहात २२ मार्च २०१७ रोजी १९ आमदारांना (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) गैरवर्तन केल्याबद्दल निलंबित करण्याचा प्रस्ताव संमत झाला होता. हिंमत दाखवा आणि म्हणा तुमची १९ संख्या ही १२ पेक्षा जास्त आहे.” असं संजय राऊत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

राऊत या आधी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “आता बारा आमदारांचं निलंबन झालेलं आहे. हा एक शिस्तीचा भाग आहे. शिस्ती मोडली जाते, अशाने सभागृहात दंगली होतील. पाकिस्तानच्या संसदेत आपण पाहिलं. काही वेळेला बिहार, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आम्ही पाहिलं आहे. संपूर्ण दंगलीसारखं चित्र निर्माण झालं होतं. महाराष्ट्रात अशा परंपरा पडू नये, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी कठोर निर्णय घेतला असेल.”

तसेच, “कोकणात एक म्हण आहे, ‘केले तुका, झाले माका’; बॉम्ब त्यांच्या हातातच होता. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण एक चूक किती महागात पडू शकते. बेशिस्त वर्तन महाराष्ट्राच्या विधानसभेत चालत नाही,” असा टोला देखील राऊत यांनी भाजपाला लगावलेला आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावर काही बोलणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २२९ नवीन रुग्णांचे निदान, एकूण कोरोना बाधितांची संख्या १३६४

News Desk

पुढील २५ वर्ष भाजपचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही, तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खोदली, राऊतांची भविष्यवाणी

Aprna

मुंबईतील इमारतींच्या दुरूस्ती व पुनर्विकासासाठी शासन सदैव प्रयत्नशील! – डॉ.जितेंद्र आव्हाड

Aprna