HW News Marathi
महाराष्ट्र

“आम्ही गेलो की राज्यपाल भाजपचे नेते असतात आणि तुम्ही…” फडणवीसांचा राऊतांना पलटवार

नवी दिल्ली | फोन टॅपिंग प्रकरणामध्ये राज्यपालांनी लक्ष घालावं या मागणीसाठी आज भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरुनही प्रश्न विचारण्यात आले. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांसंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना, राऊत यांच्याकडे खूप वेळ असून त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याइतके ते मोठे नेते नाहीत असं मत व्यक्त केलं.

मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी भाजपाचे नेते राज्यपालांकडे जातात कारण राज्यपाल भाजपाचे कार्यकर्ते आहेत अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीय, असा प्रश्न एका पत्रकाराने फडणवीस यांना विचारला. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, “संजय राऊत यांच्याकडे खूप वेळ आहे. त्यांच्याकडे बातम्या नसतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहचता. संजय राऊत हे एवढे मोठे नेते नाहीयत की मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ. राज्यपाल हे संविधानानुसार प्रमुख आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही गेलो की ते (राज्यपाल) भाजपाचे नेते असतात आणि तुम्ही कंबरेमध्ये वाकून त्यांना नमस्कार करता तेव्हा ते कोणाचे नेते असतात?,” असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

बदली घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भाष्य करण्याची गरज नाही असा बचाव सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला असता या प्रकरणावर बोलणं मुख्यमंत्र्यांना अडचणीचं ठरु शकतं असं मत व्यक्त केलं. “त्यांनी माहिती आहे की या प्रकरणावर बोलणं कठीण आहे. बोललो तर या प्रकरणाचा तपास करावा लागेल, तपास करण्याचे आदेश द्यावे लागतील. हे सर्व त्यांना नाही करायचं आहे. आपलं सरकार वाचवण्यासाठी, हफ्तेखोरीला पाठीशी घालण्यासाठी हे केलं जात आहे. संजय राऊत हे सरकारी व्यक्ती नाहीय. त्यांचं वक्तव्य हे अधिकृत वक्तव्य मानता येणार नाही. त्यामुळेच सरकारकडून कोण बोलत आहे ते सांगवं? आणि का बोलत नाहीत ते ही सांगावं,” अशी मागणी फडणवीस यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज (२४ मार्च) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकारविरोधातील 100 प्रकरणे सादर केली. त्यावर राऊत यांना विचारलं असता त्यांनी थेट राज्यपालांवरच हल्ला चढवला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला विरोधक गेले असतील. राज्यपालांना भाजपचे कार्यकर्ते म्हणण्यात गैर काय? असा सवाल करतानाच राज्यपाल कोश्यारी हे संघात होते. भाजपचे मुख्यमंत्रीही होते. त्यामुळे त्यांना भाजपचे कार्यकर्ते म्हटलं तर वावगं काय? मलाही कुणी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हटलं तर मला त्याचा अभिमानच वाटेल, असा चिमटाही त्यांनी काढला. विरोधकांना भेटायचंच असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं. राज्यपालांना कशाला भेटता? राज्यपाल काय राज्य चालवतात का? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांना भेटा. तुमचं म्हणणं त्यांच्यापुढे मांडा. चर्चा करा. त्यातून संवाद निर्माण होईल, असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहाव्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या

News Desk

खाणीच्या खोदकामात आढळली प्राचीन मुर्ती

News Desk

लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी उदय सामंत प्रयत्नशील

swarit