HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive: सदा खोत हे मी घडविलेले कच्च मडकं !

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आता विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे. राज्यातील बदलणारी समीकरणे, राजकीय पक्षांच्या बदलत्या भूमिका, आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे यामुळे आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, एच.डब्ल्यू.मराठीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी खास बातचीत केली आहे. विधानसभा निवडणुकीसाठीची राजू शेट्टी यांची भूमिका, गेल्या ५ वर्षांत त्यांच्या बदलत्या भूमिकेचा मतांवर पडलेला परिणाम, शिवसेनेचा पीक विमा मोर्चा, सदाभाऊ खोत यांचे गंभीर आरोप त्याचबरोबर हातकणंगले मतदारसंघाचे नवे खासदार धैर्यशील माने यासारख्या मुद्द्यांवर राजू शेट्टी यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी संवाद साधला आहे.

सदा खोत हे मी घडविलेले एक कच्च मडकं !

सदाभाऊ यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजू शेट्टी म्हणाले कि, “माझं काम कुंभाराचं आहे. कुंभार मातीपासून मडकी तयार करत असतो. ती मडकी तयार करत असताना एखादं मडकं कच्च निघतं. सदा खोत हे त्यातलंच एक कच्च मडकं आहे. आपणच कसे बरोबर आहोत हे दाखविण्यासाठी काही आरोप करावे लागतात. म्हणूनच ते आमच्यावर आरोप करत असतील.” त्याचप्रमाणे, “एखादं मडकं कच्च निघालं म्हणून कुंभाराने आपलं काम थांबवायचं नसतं. एखादं मडकं कच्च निघालं तरीही निराश व्हायचं नसतं”, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

कुवत नसतानाही चळवळीच्या पुण्याईमुळे ‘त्याला’ राज्याच्या विधानपरिषदेत पाठविले !

“खरंतर अत्यंत सामान्य कुटुंबातला, कर्जबाजारी परिस्थितीतला एक तरुण चळवळीच्या माध्यमातून पुढे येतोय हे बघून त्याला घडविणे, त्याला संधी देणे आणि अगदी त्याची कुवत, क्षमता नसतानाही चळवळीच्या पुण्याईचा फायदा घेऊन त्याला राज्याच्या विधानपरिषदेत पाठविणे, मंत्रिपद देण्यापर्यंत आम्ही आमचं काम चोख केलं. मात्र, त्यांना त्या व्यवस्थेचा लाभ घेण्याचा मोह झाला. चळवळीसाठीची निष्ठा त्यांना अडचणीची वाटू लागली. त्यामुळे, त्यांनी जर चळवळीकडे पाठ फिरवली असेल तर मडकं तयार करण्यात आम्ही कमी पडलो असे समजून आम्ही त्यांच्यावर फुली मारून आमचं काम करायला लागलो”, असे राजू शेट्टी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना म्हणाले.

सदाभाऊ खोत यांच्यामध्ये सत्तालोलुपता भिनलेली आहे !

“एकीकडे शेतकऱ्यांसाठी नवी संघटना स्थापन करायची भाषा करायची. दुसरीकडे भाजपच्याच लोकांच्या आघाडीचे एक पद आपल्या मुलाला देऊन टाकायचे. इतकेच नव्हे तर स्वतःदेखील भाजपच्याच तिकिटावर निवडणूक लढविण्याची तयारी ठेवायची. ही एवढी नौटंकी कशासाठी ? सदाभाऊ खोत यांच्यामध्ये सत्तालोलुपता भिनलेली आहे”, असा आरोपही राजू शेट्टी यांनी यावेळी केला आहे.

सत्तेशिवाय जगू न शकणाऱ्यांना अशा केविलवाण्या कसरती कराव्या लागतात !

“सत्तेशिवाय जी माणसे जगू शकत नाहीत त्यांना अशा प्रकारच्या केविलवाण्या कसरती कराव्या लागतात. त्या आम्हाला करायला लागत नाहीत. म्हणूनच मी म्हटलं कि मी पराभूत झालो तरीही मला अजिबात पश्चाताप वाटत नाही. कारण, माझा उदरनिर्वाह काही या खासदारकीवर नाही. मी माझे शेतकऱ्यांसाठीचे काम करत राहणार. शेतकऱ्यांना देखील त्याची जाणीव आहे”, असेही राजू शेट्टी एच.डब्ल्यू.शी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आईला बाजारात पाठवून घेतला गळफास

News Desk

‘राजगृह’ तोडफोड प्रकरणी संशयित व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

लातूरच्या पाण्यासाठी आमिरने केले श्रमदान

News Desk