HW News Marathi
देश / विदेश

रामजन्मभूमीसंदर्भात झालेला जमीन घोटाळा हा श्रीमंतांचा अपराध ! शिवसेनेचा घणाघात

मुंबई। शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देशातील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधून घेत राम जन्मभूमी जमीन खरेदी घोटाळा झाल्याच्या आरोपांवरही भाष्य केलं आहे. हा घोटाळा करणाऱ्यांच्या मागे सत्ताधारी उभे असं असल्याचं सांगत राऊतांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. देशातील वाढलेल्या आर्थिक गुन्हेगारीवर शिवसेनेचे खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून भाष्य केलं आहे. यात राम मंदिर उभारणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावरही संजय राऊत यांनी आज (४ जुलै) टीका केली.

“सर्वोच्च न्यायालयात गरीबांना न्याय मिळत नाही, असं माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई सांगतात तेव्हा श्रीमंत अपराधी न्याय विकत घेत आहेत, असा त्याचा सरळसोट अर्थ निघतो. अयोध्येत रामजन्मभूमीसंदर्भात झालेला जमीन घोटाळा हा श्रीमंतांचा अपराध आहे. हा अपराध करणाऱ्य़ाच्या मागे ‘राजशकट’ ठामपणे उभे राहते याचे आश्चर्य वाटते. गुन्हेगारी वाढते ती सामान्य लोकांमुळे नाही. गुन्हेगारी वाढते ती गुन्हेगारांना राजाश्रय देण्याच्या भूमिकेमुळे. आर्थिक गुन्हे करणारे, जमीन माफिया, संरक्षण खात्यातले दलाल, पाटबंधारे, बांधकाम खात्यातील ठेकेदार व त्यांचे दलाल देशभरात त्यांचे ‘कार्य’ पुढे नेतात. महापालिकांतील कंत्राटगिरी हे देशभरातील आर्थिक गुन्हेगारांचे कुरण बनते. श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारी ही कुरणे म्हणजे श्रीमंत गुन्हेगारांचे ‘स्वर्ग’ बनत आहेत. पोलीस कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक बनले आहेत. दंगली, हिंसाचार, हत्या, बलात्काराइतकीच श्रीमंतांतील वाढती गुन्हेगारी चिंताजनक आहे. परदेशातील बँकांत कालपर्यंत फक्त पैसेच जमा होत होते. आता पैसे देऊन देशही बदलला जातोय. गेल्या सात वर्षांत देशातील किती हजार श्रीमंतांनी पैसे मोजून दुसऱ्य़ा देशांचे नागरिकत्व विकत घेतले? एकटा मेहुल चोक्सीच ऑण्टिग्वात नाही. इतर अनेकही ब्रिटिशांप्रमाणे लूट करून स्वतःचा नवा देश निर्माण करून बसले आहेत!”, असे संजय राऊत ‘रोखठोक’मध्ये लिहितात.

परदेशातून पैसा आलाच नाही, उलट धनिकच लूटमार करून परदेशी जाऊन स्थायिक !

“गुन्हेगारी का वाढते यावर विविध मतांतरे आहेत. दारिद्र्यामुळे गुन्हेगारी वाढते असं मानलं जाते. ते खरं असेलही, पण फक्त दारिद्र्यामुळेच गुन्हेगारी वाढते असं नाही. अगदी पूर्वापारही श्रीमंतांनी, राजे-महाराजांनी, राजकारण्यांनी लुटमार केली व फसवणूक करून स्वतःची श्रीमंती वाढवली. सध्या ज्या ‘चोरकथा’ अत्यंत रंजक पद्धतीने समोर येत आहेत त्या चोरकथांचे नायक किंवा खलनायक श्रीमंत आहेत. अत्याचार, हिंसाचार, फसवणूक इत्यादी गुन्हे फक्त गरीबच करतात असे नव्हे. विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, हर्षद मेहता यांना गरीब मानायचे तर श्रीमंतीची व्याख्याच बदलावी लागेल. आपले पंतप्रधान मोदी यांनी काळा पैसा परदेशातून परत आणण्याचे वचन दिले व लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. पैसा आलाच नाही, उलट धनिकच येथे लूटमार करून परदेशी जाऊन स्थायिक होत आहेत. पाकिस्तानचे एकेकाळचे अध्यक्ष अयुब खान यांनी साठेबाजी करणाऱ्य़ा दोन व्यापाऱ्य़ाना फाशी दिले. ताबडतोब सर्व व्यापाऱ्यांनी आपण होऊन आपल्याकडील मालाचा साठा जाहीर केला. रशियाचे एकेकाळचे अध्यक्ष क्रुश्चेव्ह यांनी आपले पाकीट हरवले असल्याचे जाहीर करताक्षणीच त्यांच्या पायाजवळ हजारो पाकिटे येऊन पडली. आपल्याकडे असे कधी घडले आहे काय?,” असा सवाल करत राऊतांनी काळ्या पैशांवरून सरकारला हा टोला लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NewYear2019 : गुगलने दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

News Desk

राष्ट्रवादीला का हवाय पियुष गोयल आणि रविशंकर प्रसाद यांचा राजिनामा 

News Desk

सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे !

swarit