HW News Marathi
महाराष्ट्र

अधिकार्‍यांना हाताशी धरून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न फडणवीस हे करत आहेत – नवाब मलिक

मुंबई | आमदार फोडता येत नाही म्हणून आता अधिकार्‍यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः करत आहेत असा आरोप करतानाच फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिलेली माहिती चूकीच्या पध्दतीने ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर आरोप केल्यानंतर तात्काळ नवाब मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी ११ वाजता जी पत्रकार परिषद घेतली त्यात सगळी माहिती चुकीच्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे महाराष्ट्रात पत्रकार परिषदेची सुरुवात शक्यतो मराठीतून केली जाते परंतु फडणवीस यांनी मिडियाची माफी मागत हिंदीमध्ये सुरुवात केली याची कारणेही वेगळी आहेत असेही नवाब मलिक म्हणाले.

या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी पवारसाहेब चुकीची माहिती देत आहेत असा उल्लेख केला. परंतु याबाबत गृहमंत्र्यांनी व मीसुद्धा खुलासा केला आहे. आता ते गृहमंत्र्यांच्या हालचालीबाबत पत्रकार परिषदेत माहिती देतात. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे हालचाल पोलिस रेकॉर्ड सादर केले. ते सादर करत असताना ही हालचाल होती की नाही हे मला माहित नाही असे सांगून भ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

रश्मी शुक्ला या अनधिकृत फोन टॅप करत होत्या म्हणूनच त्यांना वेगळ्या प्रकारची शिक्षा देऊन त्याठिकाणी बसवण्यात आले. कारण ही अधिकारी बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग करत होत्या. महाविकास आघाडी सरकार बनत असताना सर्वात महत्त्वाचे जे नेते होते त्यांचे फोनसुध्दा टॅप करण्याचे उद्योग या रश्मी शुक्ला यांनी केल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

आताच्या घडीला जे अधिकारी ज्यांच्या नावाने आता आरोप आमच्या गृहमंत्र्यांवर किंवा सरकारवर होतो आहे. सचिन वाझेंच्याबाबतीत दोन प्रेस घेऊन फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी शिवसेनेचा माझ्यावर दबाव होता. त्याचवेळी त्यांनी खुलासा केला होता की, मी याच्याबाबतीत ॲडव्होकेट जनरलचा सल्ला घेतला होता असे सांगतानाच आज मंत्रालयात गृहविभागात किंवा ॲडव्होकेट जनरलला कुठलाही सल्ला मागवण्याचा एकही कागद नाही असा दावा नवाब मलिक यांनी यावेळी केला.

पहिल्या दिवसापासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची दिशाभूल करत होते. खोटे सांगून सरकारला बदनाम करण्याचे काम केले. सचिन वाझे काम आयुक्त राहिलेले परमवीरसिंग यांनी त्यांच्या चार अधिकार्‍यांना अखत्यारीत निर्णय घेऊन केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचा आदेश नव्हता असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

मुकेश अंबानी यांच्या बंगल्यासमोर जो विषय घडला तो अतिशय गंभीर आहे. एक खालचा पोलिस अधिकारी कुणाची गाडी घेऊन त्याच्यात बॉम्ब ठेवतो. त्याची कारणे काय? बॉम्ब कुणाच्या बोलण्यावरून ठेवण्यात आला याचा तपास NIA आणि ATS करतेय. ही सगळी परिस्थिती लक्षात आल्यानंतर काही वेळेला कुठलेही सरकार सुरुवातीला अधिकार्‍याची पाठराखण करते.

पण सत्य समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करायला आड येत नाही. सर्व परिस्थिती व माहिती मिळाल्यानंतर सचिन वाझे यांची पाठराखण करण्याचे काम सरकारने केले नाही. सचिन वाझे यांना अटक होण्याअगोदर परमवीरसिंग मुंबई आयुक्त असताना त्यांच्या मुख्यालयात तीन तास वाझेला घेऊन बंद दाराआड चर्चा करत होते असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

मुंबई पोलीस आयुक्त यांची बदली १७ मार्चला होत असताना १६ मार्चला त्यांनी त्यांचे (समाजसेवा शाखेचे एसीपी) कनिष्ठ अधिकारी संजय पाटील त्याच्याकडून व्हॉटस्ॲप पुरावे तयार करुन स्वतःच्या बचावासाठी सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्या लेटरचा वापर केला आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

परमवीरसिंग टीआरपी घोटाळ्याबाबतीत पुढे पुढे होते मात्र मागील दोन महिने ते गार पडले होते. त्यांच्यावर कोणता दबाव होता हे आम्हाला माहीत नाही. पण आजच्या घडीला परमवीरसिंग लेटर लिहितात तेव्हा लेटरमध्ये ते दोन मुद्दे उपस्थित करत आहेत. त्यामध्ये गृहमंत्र्यांनी टारगेट दिले होते तो खोटा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी स्वतः पुरावे निर्माण करुन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

दुसरा मुद्दा डेलकर आत्महत्या प्रकरणात गृहमंत्री भाजपच्या नेत्यांना फसवण्याचा प्रकार करा असा आदेश मला देत होते असे म्हटले आहे. यात स्पष्ट प्रश्न आहे मोहन डेलकर यांची आत्महत्या मुंबईमध्ये झाल्यानंतर गुन्हा मुंबईत होणार की दादरा नगर हवेलीमध्ये होणार याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

परमवीरसिंग यांचे आरोप स्वतःला वाचवण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. दोन – तीन दिवस फडणवीस प्रेस घेऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. ते स्पष्टपणे आज उघडे पडले आहेत. हिंदीमध्ये प्रेस घेऊन फडणवीस यांनी सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्या प्रेसमध्ये रश्मी शुक्लाची बाजू ज्यापध्दतीने ते मांडत होते. बेकायदेशीररित्या फोन टॅप करणे हा गुन्हा आहे. फडणवीस ज्या रिपोर्टचा संदर्भ देत होते. त्यामध्ये ८० टक्के पोलिसांची बदली झालेली नाही.

ज्या रिपोर्टचा संदर्भ देत होते की, गृहमंत्री पैसे घेत होते परंतु गृहमंत्री ही नावे फायनल करत नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात त्याआधी ते निर्णय जस्टीफायसाठी गृहमंत्र्यांकडे येते तो निर्णय करत असताना एसीएस होम, डीजी त्याकाळातील सुबोध जस्वाल या समितीमध्ये असताना त्यांनी ज्या शिफारशी केल्या त्यांच्या बदल्या झाल्या आहेत. खालच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांची शिफारस पोलीस इस्टाब्लीशमेंट बोर्ड याचे अध्यक्ष ज्यांनी ही नोट पाठवले आहे ते स्वतः त्याचे अध्यक्ष असताना जी नावे पाठवली त्या बदल्या झाल्या आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं जो रिपोर्टमध्ये आहे त्याच बदल्या झाल्या ते खोटं बोलत आहेत त्यांना सत्तेशिवाय रहाता येत नाहीय असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजपाने या देशात कर्नाटकचे सरकार पाडले. उत्तराखंडमध्ये सरकार बदल केला. ईशान्य भारतात सरकार बदल केला. मध्यप्रदेशमध्ये सरकार बदलले. त्यांना महाराष्ट्रात आमदार फोडता येत नाही म्हणून त्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करुन केंद्राचा वापर करत हे सरकार बदलता येते का हा प्रयत्न भाजप करत आहे. परंतु आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे त्यामुळे कुठलंही सरकार बहुमतात आहे तोपर्यंत सत्तेपासून कुणी दूर करु शकत नाही.

सुप्रीम कोर्टाची बोमाय केसमध्ये एक अॉर्डर आहे. Any government can be have right or not to be in government or not can be decided on the floor of the house. जोपर्यंत सरकार फ्लोअर वर बहुमत सिद्ध करु शकत नाही तोपर्यंत कुठलंही सरकार सत्तेपासून दूर करता येत नाही. ते अधिकार राज्यपाल किंवा केंद्रसरकारला नाही याची आठवण नवाब मलिक यांनी करुन दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अशोक चव्हाणांना ‘त्या’ पदावरून हटवा !, विनायक मेटे आक्रमक

News Desk

सर्वसामान्यांना तत्परतेने न्याय देणारी यंत्रणा उभारणार! – किरेन रिजिजू

Manasi Devkar

कोल्हापूर – सांगलीवर पुन्हा एकदा महापुराचे संकट घोंघावत आहे…!

swarit