मुंबई | शिवसेनेच्या वतीने अजान पठण स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं आहे. मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं पांडुरंग सकपाळ यांनी एका बसीरत ऑनलाइनशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी त्यांनी अजानला विरोध करणंही चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यावरुन भाजपने शिवसेनेवर टीका केली आहे.
“अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे मनःशांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते. पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”.
अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस दिलं जाईल. यासाठी मौलाना परीक्षकाचे काम पाहतील. स्पर्धेचा सर्व खर्च शिवसेना करणार आहे,” अशी माहिती पांडुरंग सकपाळ यांनी दिली आहे. “महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यावर वाद घालणं उचित वाटत नाही,” असे पांडुरंग सकपाळ म्हणाले आहेत.
प्रविण दरेकर –
शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे विधान आश्चर्यकारक आहेच, परंतु शिवसेनेचं बदलतं स्वरूप सत्तेननंतर दिसत आहे. त्यांनी आणखी कहर म्हणजे बाळासाहेबांचा दाखला दिला आहे, बाळासाहेब प्रत्येक धर्म प्यारा बोलले असतील परंतु त्यांची पालखी उचलणे कधी बोलले नाही तर त्यांची टीका त्यांच्या आचार विचारावर त्यांनी केलेली आहे
सत्तेच्या नादात मानवतेचा उल्लेख करून हिंदुत्वाची भूमिका सरमिसळ झाल्याचे पांडुरंग सकपाळ यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. मातोश्रीत नमाज पढल्याचा उल्लेख हे मोठं विधान आहे .
पांडुरंग सकपाळ हे संजय राऊत यांचे निकटवर्ती आहेत आणि म्हणून संजय राऊत यांनी सत्ता टिकवण्यासाठी आज शिवसेनेच्या मूळ आचार विचाराला नेतृत्वाला तिलंजला देणारी वाटचाल येथे सुरु आहे ह्याच हे द्योतक आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी नमाजासंदर्भात भोंगेवरुन त्यांनी घेतलेली भूमिका व त्यांनी केलेली कडवट टीका देशवासियांनी पाहिलेली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या हिंदुत्वाचा व देशप्रेमाचा विसर सातत्याने शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर पडत चालल्याचे चित्र आहे.