HW News Marathi
महाराष्ट्र

“परमबीर सिंग अनेकांशी बोलले असतील, संपर्कात असतील मगच त्यांनी पत्र लिहिलं असावं”, पवारांचं सुचक वक्तव्य

नवी दिल्ली | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी ज्युलिओ रिबेरो सारख्या एखाद्या उत्तम अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राजीनामा घ्यायचा की नाही याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तेच याबाबत निर्णय घेतील असंही ते म्हणाले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप सिंग यांनी केल्यानंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची विरोधकांनी मागणी केली आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली.

यावेळी त्यांनी राज्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. हे गंभीर प्रकरण आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आरोप झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची चांगल्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाली पाहिजे, असं सांगतानाच ज्युलिओ रिबेरो सारखे अधिकारी आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असं पवार म्हणाले.

मी आताच आग्र्याहून आलो आहे. मी या प्रकरणी आतापर्यंत केवळ मुख्यमंत्र्यांशीच बोललो आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी अजूनही चर्चा केली नाही. राजीनामा घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही. आम्ही देशमुखांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि सहकाऱ्यांशीही चर्चा करू, असं पवार यांनी सांगितलं. उद्यापर्यंत देशमुखांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. उद्या पर्यंत मात्र, राजीनामा मागणं हे विरोधकांचं कामच आहे, असंही ते म्हणाले.

फडणवीस आले आणि लेटर आलं, पवारांचा खोचक टोला

यावेळी पवारांनी विरोधी पक्ष आणि परमबीर सिंग यांचं साटंलोटं असल्याचे संकेतही दिले. विरोधी पक्षनेते दिल्लीत आले त्यांनी पत्रकार परिषद घेतली. परमबीर सिंगही दिल्लीत आले होते. त्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्रं दिलं. ते अनेकांच्या संपर्कात असतील. त्यांच्याशी बोलले असतील. त्यानंतरच पत्रं आलं असावं, असंही पवार म्हणाले. मात्र, यावेळी पवारांनी कुणाचंच थेट नाव घेतलं नाही.

शरद पवारांची निरीक्षणं

यावेळी पवारांनी सिंग यांच्या पत्रावर काही निरीक्षणे नोंदवली आहे. सिंग यांच्या पत्रावर सही नाही. तसेच त्यांनी गृहमंत्र्यांना १०० कोटी रुपये दिले जात असल्याचं म्हटलं आहे. परंतु हे पैसे कसे दिले गेले याचा काहीच उल्लेख करण्यात आलेला नाही. कुणाकडे दिले याचाही उल्लेख नाही. तसेच बदली झाल्यानंतरच सिंग यांनी हे आरोप केले आहेत, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. बदली होत असल्याने सिंग नाराज होते. त्यामुळे त्यांनी हा आरोप केल्याचंही पवार म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मी यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकंही वाचली’, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला!

News Desk

विधानभवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई व्हावी !

News Desk

ठाकरे गटाला मोठा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश

Aprna