HW News Marathi
मुंबई

मुंबई महापालिका निवडणूक फ्रेंडली मॅच नाही, ही अस्मितेची लढाई; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणतात की ही फ्रेंडली मॅच आहे. मात्र त्यांना मी सांगतो की तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा मित्र तुम्ही गमावला आहे, तेव्हा महापालिका निवडणूक ही फ्रेंडली मॅच नसून अस्मितेची लढाई आहे, असे खणखणीत आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरगाव येथे झालेल्या जाहीर सभेत दिले. जो काही पराक्रम दाखवतील ते माझे शिवसैनिक त्यांच्या मनगटाच्या ताकदीवर दाखवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मला आता युतीच्या राजकारणात काही हात घालायचा नाही, तेव्हा कुठलाही डाग भगव्याला लागू देऊ नका. महापालिकेवर फक्त स्वच्छ भगवाच फडकला पाहिजे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. कारण आम्ही जुगार खेळत नाही तर अस्मितेची लढाई लढत आहोत, असेही त्यांनी पुन्हा सांगितले. मुंबईला अस्मिता आहे, इतिहास आहे, हा पूर्ण परिसर भगवा व्हायला हवा. शिवरायांच्या भगव्यावरील इतर डागांचे पट्टे पुसून टाका, असे जोरदार आवाहन त्यांनी केले.

मेट्रोच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, शिवसेना विकासाच्या विरोधात असल्याचे चित्र रंगवण्यात आले, पण आम्ही विकासाच्या विरोधात नाही. ‘विकास आम्हाला हवा आहे, मात्र आमची थडगी उभारून विकास होऊ देणार नाही’, असे त्यांनी ठणकावले.

शिवस्मारक आणि आंबेडकर स्मारकारचे भूमिपूजनं उरकून त्याचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपच्या भूमिकेवर कडाडून टीका कराताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ज्याचं टेंडर निघालं नाही, वर्क ऑर्डर नाही अशा शिवस्मारकाचं भूमिपूजन-जलपूजन निवडणुकीच्या तोंडावर यांनी उरकलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे केवळ भूमिपूजन केलं पण पुढे काहीच होत नाही.’

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी डोंबिवली येथील साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राच्या नकाशाचे तुकडे करू नका, असे सुनावले. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी सबनीसांचे जाहीर अभिनंदन केले. तुम्ही संयुक्त महाराष्ट्राला मतदान करणार की तोडणाऱ्याला करणार, मुंबईकरांना साथ देणार की मुंबईकरांना गाफील ठेऊन तुकडे पाडणाऱ्यांना मदत करणार, असा खणखणीत सवाल त्यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:

अमित शहांना सांगू इच्छितो ही फ्रेंडली मॅच नाही, तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा मित्र तुम्ही गमावला आहे, तेव्हा आता ही अस्मितेची लढाई

शिवसेनेची कामं लोकांपुढे घेऊन जा

मला आता युतीच्या राजकारणात काही दम वाटत नाही, तेव्हा कुठलाही डाग भगव्याला लागू देऊ नका

शिवरायांचा भगवा फडकवा, स्वच्छ भगवा फडकवा, त्यावर कोणताही डाग चालणार नाही, पूर्ण भगवा पाहिजे

गरीबांना त्यांच्या योजना मिळाल्या पाहिजे, पण मध्यमवर्गिय कुठे जाणार आम्ही शिवसेनाप्रमुखांच्या नावाने आरोग्य योजना देणार आहेत

मेट्रोच्या विस्थापितांना कुठे जागा देणार असा सवाल केला, जोपर्यंत गिरगावच्या लोकांचा होकार येत नाही तोपर्यंत मेट्रोची एकही वीट रचू देणार नाही

ज्याचं टेंडर निघालं नाही, वर्क ऑर्डर नाही त्याचं भूमिपूजन-जलपूजन निवडणुकीच्या तोंडावर यांनी केलं

मुंबईचा गळा चिरण्याचे प्रयत्न करणाऱ्यांना आम्ही उभा चिरू ही शिवसेनाप्रमुखांची भूमिका आम्ही आजही सोडलेली नाही, महाराष्ट्राच्या बाबतीही तेच आहे

साहित्य संमेलनात श्रीपाल सबनीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कान उपटले याबद्दल धन्यवाद देतो

नोटाबंदीच्या १३ व्या महिन्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावं अशी आमची मागणी होती पण ते काही बोलले नाही, मात्र आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या वचननाम्यात कर्ज माफ करू म्हटले आहे, पण इथे सरकार आहे मग इथे कर्ज माफ का नाही करत?

शेतकऱ्यांना यंदा कुठे चांगले दिवस आले तर यांनी नोटाबंदी करून दिली, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले

ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर व्याज वाढवून द्या, अशी आमची मागणी होती.

५०० फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करणार असं वचन मी दिले आहे, ते म्हणत होते मालमत्ता कर वाढवणार नाही, पण मी रद्द करणार असं वचन दिलं आहे

तुम्हाला मुंबई समजली नाही, म्हणून जनतेकडून सूचना मागवता आहात, आणि मग तुम्ही थापा मारणार.

मेट्रोचा पुढचा टप्पा करणार त्याची कसली जाहिरात करतात.

Did you know चे मुद्दे खोडून दाखवा, जाहीर आव्हान आहे.

परिवर्तन होणार असे मुख्यमंत्री म्हणतात, पण घाई कशाला अजून अडीच वर्ष बाकी आहेत, करू सगळीकडे परिवर्तन.

नोटाबंदीनंतर सगळ्या धाडी आपल्या व्यापाऱ्यांवर, सराफांवर पडल्या ते मग आमच्याकडे धावत आले आणि घोषणा दिली ‘एकही भूल… (लोक म्हणाले कमल का फूल)

काँग्रेसला खड्ड्यात जायचे आहे, म्हणून त्यांना सगळीकडे खड्डेच दिसतात.

अनेकांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, ते संपले पण शिवसेना तिथेच आहे.

पाकिस्तानच्या गळ्यातगळे घालणार असाल तर आमचा विरोध कायम राहणार, आहे इथे आमचा मतभेद.

जी कामे केली ती आमच्या शिवसैनिकांनी केली आहेत, भाजपने नाही, कारण त्यांनीच ते नाकारले.

केंद्र सरकारचा अहवाल आणला आहे, ज्यामध्ये अर्थमंत्रालयाने म्हटले आहे की मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक आहे, याला म्हणतात स्वत:च्या हाताने दात तोंडात घालणे

जो शिवसेनेला जो आव्हान देतो तो पुढच्या राजकारणात दिसत नाही, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद देतो

ही फ्रेंडली मॅच आहे असं अध्यक्ष बोलतात आणि लिंबूटिंबू कौरव-पांडव म्हणता नक्की काय तेच कळत नाही

ज्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांनी कोणताही आवाज केला नाही, त्यांना अनेक धन्यवाद देतो, अशा शिवसैनिकांमुळे आपण मजबूत आहोत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचारसभेसाठी चिराबाजार येथे पोहोचले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगना राणावत बहिण रंगोली सोबत वांद्रे पोलिस स्थानकात हजर

News Desk

लोकलमध्ये मंगळसूत्र चोरून ट्रॅकवर उडी मारणारी महिला पोलिसांच्या ताब्यात

News Desk

सायन पनवेल महामार्गावर पाण्याची पाईप लाईन फुटली

News Desk