HW News Marathi
राजकारण

प्रश्न इतकाच आहे की, विखे जाणार कुठे ?

मुंबई । राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर नगर जिल्ह्यातल्या राजकारणाने वेगळेच वळण घेतले. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काँग्रेसमधील राजीनाम्यापासून अगदी भाजप प्रवेशापर्यंत चर्चा रंगू लागल्या. दरम्यान, या संपूर्ण राजकारणा संदर्भात शिवसेनेने आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे. “विखेंनी काँग्रेस सोडणे, म्हणजे नगर जिह्यातील संपूर्ण काँग्रेसनेच राजीनामा देण्यासारखे आहे. प्रश्न इतकाच आहे की, विखे जाणार कुठे? ते सुपुत्र सुजयचे बोट पकडून भाजपात जाणार की त्यांच्या मनात आणखी काही घोळत आहे”, असे सामनामध्ये म्हणण्यात आले आहे.

काय आहे आजचे सामनाचे संपादकीय ?

राधाकृष्ण विखे-पाटील यांचे तळ्यात मळ्यात एकदाचे संपले. त्यामुळे काँग्रेसही सुटली व ते स्वतःही मनमोकळे झाले. विखेंनी काँग्रेस सोडणे, म्हणजे नगर जिह्यातील संपूर्ण काँग्रेसनेच राजीनामा देण्यासारखे आहे. प्रश्न इतकाच आहे की, विखे जाणार कुठे? ते सुपुत्र सुजयचे बोट पकडून भाजपात जाणार की त्यांच्या मनात आणखी काही घोळत आहे.

सुजय विखे यांची निवडणूक आटोपताच पिताजी राधाकृष्ण विखे–पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण हे गेले महिनाभर राजीनामा खिशात ठेवूनच फिरत होते. विखेंनी विरोधी पक्षनेतेपद सोडले व आता काँग्रेसचाही राजीनामा देतील. विखे घराण्याच्या जाण्याने महाराष्ट्रातील काँग्रेसचा उरलासुरला बुरुजही कोसळला आहे. नगर, शिर्डी भागात विखे घराण्याचे प्रस्थ जुने आहे. काँग्रेस परंपरेतील जुने घराणे व त्याहीपेक्षा सहकार क्षेत्रातील तालेवार म्हणून ते ओळखले जातात. यापूर्वी विखे घराणे शिवसेनेतही डेरेदाखल झाले होते. केंद्रात व राज्यात शिवसेनेची मंत्रीपदे त्यांनी भूषवली होती व तेव्हा चि. सुजय हे शाळकरी होते. आज त्याच सुजयसाठी राधाकृष्ण यांनी प्रतिष्ठा पणास लावली. सुजय यांना काहीही करून खासदार व्हायचेच होते व त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सुजय यांच्या प्रचारात काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते भाग घेतील काय व भाजपच्या प्रचारात भाग घेतल्याबद्दल विखेंवर काय कारवाई होईल? असे प्रश्न त्यानंतर उपस्थित होत होते. मात्र खुद्द राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे. विखे यांनी नगर लोकसभा मतदारसंघात भाजपचा जोरदार प्रचार केला. महाराष्ट्रात ते

काँग्रेसच्या प्रचारासाठी

कोठेही गेले नाहीत. खुद्द शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे यांच्या संमतीचा काँग्रेसी उमेदवार असतानाही विखे काँग्रेसपासून लांब राहिले. आता त्यांनी राजीनामाच दिला व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात सामील झाले. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे तळ्यात मळ्यात एकदाचे संपले. त्यामुळे काँग्रेसही सुटली व ते स्वतःही मनमोकळे झाले. विखेंनी काँग्रेस सोडणे, म्हणजे नगर जिह्यातील संपूर्ण काँग्रेसनेच राजीनामा देण्यासारखे आहे. प्रश्न इतकाच आहे की, विखे जाणार कुठे? ते सुपुत्र सुजयचे बोट पकडून भाजपात जाणार की त्यांच्या मनात आणखी काही घोळत आहे. सुजय यांनी भाजपची वाट धरली तेव्हा आम्ही त्यांना गमतीने म्हणालो होतो, “झाले गेले विसरून जा. आपण शिवसेनेत या. पुत्र भाजपात व पिता शिवसेनेत. त्यामुळे ‘युती’ मजबूत होईल.’’ अर्थात यातील विनोदाचा भाग सोडा, पण विखेंनी भगवा खांद्यावर घेऊन शिवसेना उमेदवाराचा जोरात प्रचार सुरू केल्याचा नक्कीच फायदा होईल. वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱया पक्षात अशी अनेक उदाहरणे या देशात असल्याची सारवासारव अशोक चव्हाण यांनी केली होती. मुलास लोकसभेची उमेदवारी मिळवून देऊ शकलो नाही

याचे शल्य

विखेंना टोचत होते. राष्ट्रवादी काँग्रेसने बाजूचा नगर मतदारसंघ काँग्रेससाठी सोडावा व त्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीवर दबाव आणावा अशी विखेंची मागणी होती, पण कुणी काहीच करू शकले नाही व सुजय यांना भाजपच्या पदरात टाकून विखेंनी पितृकर्तव्य बजावले. विखे यांची स्वतःची अशी ताकद नक्कीच आहे. सहकार, शैक्षणिक संस्था, उद्योगांच्या माध्यमांतून लोणी-प्रवरानगर परिसरात त्यांनी मोठे साम्राज्य उभे केले आहे व हजारोंना त्याचा लाभ झाला आहे. पण विखेंना राजकीय विरोधकही कमी नाहीत व जिह्याच्या वर्चस्वाच्या लढाईत विखे-बाळासाहेब थोरातांचा संघर्ष जुना आहे. तो आता जास्तच भडकला आहे. हा संघर्ष आता पुढच्या पिढीकडे सरकावा हे दुर्दैव म्हणावे लागेल. सुजय विखे यांनी सरळ सरळ दम भरला आहे, ‘तुम्ही चुकीचे केले आहे. आता परतफेड करावी लागेल. मी काही राधाकृष्ण विखे-पाटील नाही.’ सुजय विखेंनी जे सांगायचे ते स्पष्ट सांगितले. भविष्यातल्या नव्या झगडय़ाची ही नांदी ठरू नये. नगर आणि शिर्डीत पाण्याचा प्रश्न बिकट आहे. लोकांना पाणी हवे आहे, शेतकऱयांना हमीभाव आणि तरुणांना रोजगार हवा आहे. सर्वच राजकारण्यांनी व सम्राटांनी या ज्वलंत प्रश्नाकडेही लक्ष द्यावे. निवडणुका त्यासाठीच लढवल्या जातात. विखेंनी तळ्यात-मळ्यातला संभ्रम संपवला. आता जिह्यातील विधायक कार्यात झोकून द्यावे !

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायावती एका उमेदवारीसाठी १५ कोटी रुपये घेतात, हा त्यांचा उद्योगच !

News Desk

भारत जोडो यात्रेत सेवादलाचे नेते कृष्णकुमार पांडेंच्या निधनानंतर राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली

Aprna

#RamMandir : न्यायालयाने देशाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत !

News Desk