HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र….!

मुंबई। ‘माननीय श्री उद्धव ठाकरे जी’ असा उल्लेख करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर अटकनाट्यामुळे जो तणाव पाहायला मिळाला होता त्या पार्श्वभूमीवर राणेंच्या या पत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.नारायण राणे आणि सध्याच्या शिवसेना नेतृत्वातील कटुता नवी नाही. त्यातून सातत्याने संघर्षही पाहायला मिळालेला आहे. अलीकडेच मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री असलेल्या राणे यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली. त्यामुळे चीडलेल्या राणे यांनी शिवसेनेवरील हल्ले आणखी तीव्र केले. हा संघर्ष सुरू असतानाच राणे यांनी बुधवारी (२९ सप्टेंबर) मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेलं पत्र लक्षवेधी ठरलं आहे.

रुग्णवाहिकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे या पत्रातून मांडला

राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे या पत्रातून मांडला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेची गरज पाहता व सद्यस्थितीत कोविड १९ संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे, असे नमूद करताना याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला जावा, अशी विनंती राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने १३वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त अखर्चित निधी तसेच १४वा वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या व्याजाची ८९ लाख ९१ हजार ९५१ रुपये इतकी रक्कम राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, पुणे यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेली आहे.

या संदर्भात आपण योग्य ती कार्यवाही करावी

या रकमेतून सहा रुग्णवाहिका खरेदी करण्यास मंजुरी देण्याची विनंती ग्रामविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे करण्यात आली आहे. रायगड, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्हा परिषदांनी सदर योजनांमधील निधीतून रुग्णवाहिका खरेदी केलेल्या आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा प्रस्ताव संबंधित कार्यालयाकडे अद्याप प्रलंबित आहे. या संदर्भात आपण योग्य ती कार्यवाही करावी ही नम्र विनंती, असे राणे यांनी पत्रात नमूद केले आहे.दरम्यान, ९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. त्या कार्यक्रमाची आधीपासूनच चर्चा असताना राणे यांचे हे पत्र दोन्ही नेत्यांमधील तणाव कमी होत असल्याचे संकेत देत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केजरीवाल ध्यानधारणेसाठी इगतपुरीत

News Desk

शरद पवारांनी गोपिनाथ मुंडेंना भाजप ‘न’ सोडण्याचा सल्ला दिला होता !

Arati More

मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विनम्र अभिवादन

News Desk