HW News Marathi
महाराष्ट्र

उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीमुळे मुंबईच्या महत्त्वास कोणतीही बाधा येणार नाही

मुंबई | उत्तर प्रदेशात सुसज्ज फिल्मसिटी उभारण्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. शाब्दिक राजकारण रंगले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याची धडपड उत्तम आहे. मात्र, असे प्रकल्प चालवणे किती अवघड असते, याचाही अभ्यास करणे गरजेचे असते, असे म्हटले आहे. यापूर्वी मॉरिशस, श्रीलंका, उझबेकिस्तान या देशांनी चित्रपटनिर्मितीसाठी विशेष सवलती देऊ केल्या, रेड कार्पेट अंथरले. मात्र, काही तिथे तर फार कुणी तेथे गेले नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशातील फिल्मसिटीमुळे मुंबईच्या महत्त्वास कोणतीही बाधा येणार नाही. यापूर्वी मुंबईतून आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र अहमदाबादला गेले. तेव्हाही मुंबईस फरक पडला नाही, असा टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे. किंबहुना केंद्र सरकारने कलम ३७० हटवल्यानंतर काश्मिरात फिल्मसिटी उभारायला पाहिजे होती, असे शिवसेनेने टोला लगावला आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

सध्या मुंबईतील चित्रपटसृष्टीच्या गळ्याला नख लावण्याचे काम सुरु असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे. चित्रपटसृष्टीतील प्रमुख मंडळींवर दबाव टाकला जात आहे, त्यांचे खच्चीकरण केले जात आहे. जणू काही सिनेउद्योगाने व त्यात काम करणाऱ्या चमकदार मंडळींनी मुंबई सोडून जावे, असे वातावरण निर्माण केले जात आहे काय, अशी शंका येऊ लागली आहे. मायानगरीतले कलावंत, दिग्दर्शक, छायाचित्रणकार वैगैरे मंडळींनी अभिनय कला सोडली असून ते गर्दुल्ले बनले आहेत. कला वैगैरे सोडून त्यांनी आपापाल्या घरांच्या गॅलरीत व बाल्कनीत गांजा, अफूची बाग फुलवली आहे, असे एक विदारक चित्र पद्धतशीरपणे निर्माण केले जात आहे. याच चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा वापर पंतप्रधान मोदी व अनेक राज्यांनी आपापल्या राजकीय प्रतिष्ठेसाठी करुन घेतलाच आहे, याची आठवण शिवसेनेने भाजपला करून दिली.

“मुंबईसह जगात किंवा देशात जे महत्त्व प्राप्त झाले त्यात सिनेउद्योगाचा वाटा महत्त्वाचा आहे. मुंबई ही मायानगरी आहे असे जे म्हटले जाते ते बहुधा यासाठीच. मुंबईतील सिनेजग व त्यास मिळालेली प्रतिष्ठा ही काही एका रात्रीत पावसाळी छत्रीप्रमाणे उगवलेली नाही. मुळात भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणारे दादासाहेब फाळके हे मराठी मातीचे सुपुत्र होते. चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवताना त्यांना जो संघर्ष करावा लागला, खस्ता खाव्या लागल्या त्यातून त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीचे बीज रोवले. 1911 मध्ये दादासाहेबांनी मुंबईत ‘लाइफ ऑफ जिझस ख्राईस्ट’ हा मूक चित्रपट पाहिला आणि त्यांच्या आयुष्यातले नवे संघर्ष आणि ध्यासपूर्व सुरु झाले. संपूर्ण स्वदेशी चित्रपट बनवायचाच या विचाराने त्यांना झपाटून टाकले. त्यांनी लंडनला जाऊन चित्रपटविषयक तांत्रिक ज्ञान मिळवले. तेथून यंत्रसामग्री व इतर माल मागवण्यासाठी नोंदणी केली. हे सर्व करताना त्यांना स्वत:चे घरदार, पत्नीच्या अंगावरी दागिने गहाण ठेवावे लागले. भारतीय बनावटीचा पहिला मराठी मुकपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला. त्याचे नाव ‘राजा हरिचंद्र’ त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टीने मागे वळून पाहिले नाही”, अशी चित्रपटसृष्टीबद्दलची थोडक्यात माहिती अग्रलेखात दिली आहे.

“मुंबई म्हणजे चित्रपटसृष्टीची जन्मभूमी किंवा कर्मभूमी हे ठसवण्यात गेल्या शंभर वर्षात अनेकांचे योगदान आहे. कोल्हापुरात मराठी सिनेमे तर मुंबईत हिंदी सिनेमे वर्षानुवर्ष तयार होत आहेत. मुंबईस जी चमक-धमक मिळत असते त्यात मायानगरीचे अस्तित्व हे कारण आहेच. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मायानगरीस बदनाम करण्याचे, तिचे खच्चीकरण करण्याचे, त्यात काम करणाऱ्या प्रमुख मंडळींवर दाबदबाव टाकण्याचे प्रयोग सुरु झाले आहेत. जणू काही सिनेउद्योगाने व त्यात काम करणाऱ्या चमकदार मंडळींनी मुंबई सोडून जावे, असे वातावरण निर्माण केले जात आहे का, अशी शंका येऊ लागली आहे”, असंही सामना अग्रलेखात म्हटले आहे.

“मायानगरीतले कलावंत, दिग्दर्शक, छायाचित्रणकार वगैरे मंडळींनी अभिनय कला सोडली असून ते गर्दुल्ले बनले आहेत. कला वगैरे सोडून त्यांनी आपापल्या घरांच्या गॅलरीत व बाल्कनीत गांजा, अफूची बाग फुलवली आहे, असे एक विदारक चित्र पद्धतशीरपणे निर्माण केले जात आहे. बरं याच चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनेक राज्यांनी आपापल्या राजकीय प्रतिष्ठेसाठी करुन घेतलाच आहे. गुजरातमध्ये मोदी व सलमान खान पंतग उडवीत होते. अमिताभ बच्चन तर गुजरातचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर होते. मोदी यांची आंबे खाण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती याची सखोल माहिती जनसामान्यांना प्राप्त व्हावी म्हणून अभिनेता अक्षय कुमार यांच्यावर खास जबाबदारी होतीच. मोदी यांच्यावरील चित्रपटात विवेक ऑबेरॉय तर मनमोहन सिंह यांच्या चित्रपटात अनुपम खेर यांनी कमाई केलीच आहे. म्हणजे मुंबईच्या चित्रपटसृष्टीतूनच निघालेल्या किरणांनी राजकर्त्यांना प्रकाशमान केले आहे. या चित्रपटसृष्टीच्या गळ्यास नख लावण्याचे प्रयत्न सुरु असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज यांनी त्यांच्या राज्यात फिल्मसिटी उभारली जाईल व आंतरराष्ट्रीय सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु होईल. पुढच्या दोन-अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल”, असंही अग्रलेखात म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कामाठीपुरा येथे पुढील तीन महिन्यात विकास प्रकल्प सुरु होईल! – जितेंद्र आव्हाड

Aprna

जिल्हा बँकेच्या निवडणुका घेण्यासाठी परवानगी!

News Desk

सोलापूरच्या पालकमंत्री पदी जितेंद्र आव्हाड यांची तात्काळ नियुक्ती

swarit