HW News Marathi
महाराष्ट्र

डोमकावळ्यांची पिसं झडून जातील, चोची तुटून जातील!; राऊतांचा विरोधकांवर निशाणा

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “डोमकावळे कितीही फडफडले तरीही त्यांना आमचं सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही”, अशी अत्यंत बोचरी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये वारंवार वादाची ठिणगी पडली, एकमेकांवर टोकाची टीका झाली. याच पार्श्वभूमीवर, भाजपच्या टिकांवर प्रत्युत्तर देताना आज (२३ ऑक्टोबर) नाशिकमध्ये संजय राऊतांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.

भाजपकडून वारंवार सरकार पाडण्याच्या केल्या जाणाऱ्या टिकेला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले की, “मी दिल्लीत जिथे मी राहातो, तिथे खूप मोर आहेत. अनेकदा तिथे मी डोमकावळ्यांची फडफडसुद्धा बघतो. पण डोमकावळे कितीही फडफडले तरीही त्यांना आमचं सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही. संजय राऊतांवर कितीही आरोप केले तरीही माझ्या पाठिचा कणा ताठ आणि मन खंबीर आहे. मी माझ्या शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार आहे.”

डोमकावळ्यांची पिसं झडून जातील, चोची तुटून जातील!

महाविकासआघाडी हे देशातील सर्वोत्तम सरकार असल्याचा दावाही यावेळी संजय राऊतांनी केला. “देशात सर्वोत्तम चाललेलं कोणतं सरकार असेल, तर ते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली चालणारं महाविकास आघाडीचं सरकार आहे. कोणालाही कितीही फडफड आणि बडबड करू द्या. त्या डोमकावळ्यांची पिसं झडून जातील, चोची तुटून जातील”, अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केली आहे.

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाडींबाबत देखील संजय राऊतांनी टोलेबाजी केली आहे. राऊत म्हणाले, “महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे. पण काहींना वाटतं की या राज्यात आपण गांजा, भांग पिकवू. लक्षात घ्यावं की हे कधीही शक्य नाही. केंद्रीय यंत्रणांमार्फत तुम्ही आमच्यावर किती घाव कराल? सरकार पडत नसेल, तर आर्मीला बोलवा. तेच बाकी राहिलं आहे. तिन्ही पक्षांचं हेच म्हणणं आहे की हे सरकार ५ वर्ष टिकेल. इतकंच काय तर भविष्यातही आम्ही एकत्र काम केलं तर २५ वर्ष या सरकारला धक्काही लावता येणार नाही”, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

महाविकासआघाडी सरकार ही पुलोदचीच प्रतिकृती!

“महाविकासआघाडी सरकार म्हणजे राज्यातील पुलोद सरकारनंतरचा पहिलाच प्रयोग आहे. महाविकासआघाडी सरकार ही पुलोदचीच प्रतिकृती आहे. त्या सरकारचे नेतेही शरद पवारच होते आणि आताही शरद पवारांचंच मार्गदर्शन आहे. त्याचसोबत, उद्धव ठाकरेंचा भक्कम पाठिंबा आणि गांधी परिवाराचं पाठबळ आहे. या सगळ्यातून हे सरकार निर्माण झालेलं आहे”, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावले!

News Desk

मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

News Desk

पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होईपर्यंत पालकांकडून फी मागू नये

swarit