HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंच्या अटके साठी नाशिक पोलिस आयुक्तांचे निर्देश!

नाशिक। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात युवासेनेने तक्रार नोंदवली होती. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. राणेंचा मुक्काम सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये असून त्यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

नेमका काय प्रकार आहे?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने युवासेनेने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. नारायण राणे सध्या परशुराम घाटातील ग्रीन रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. नाशिक पोलिसांचे पथक येथूनच नारायण राणे यांना ताब्यात घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता राणे समर्थक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

नारायण राणेंवर गुन्हा दाखल

नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत. गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्यापकता लक्षात घेत अटक करण्यासाठी पोलिसांची टीम तयार आहे. नाशिक पोलीस उपायुक्त संजय बरकुंड, तपास अधिकारी आनंदा वाघ यांच्या अध्यक्षतेत टीम कारवाई करणार आहे.

पोलिसांकडून आदेश

सदर गुन्ह्यातील आरोपी नारायण राणे हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे अटक केल्यानंतर उपराष्ट्रपतींना कळवलं जावं. अटकेची माहिती भारत सरकारला द्यावी. कारवाईवेळी राजशिष्टाचाराचं पालन करा, हक्कभंगाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेश नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.

कुठे कुठे गुन्हे दाखल?

नारायण राणे यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

रायगड

महाड

नाशिक

औरंगाबाद

पुणे

काय म्हणाले नारायण राणे?

पिंजऱ्यात राहतो… हा कसला मुख्यमंत्री

आताचे राज्य, या राज्याला मुख्यमंत्री आहे, मला वाटत नाही. मुख्यमंत्री कोण आहे? काही दम नाही ओ, पिंजऱ्यात राहतो…हा कसला मुख्यमंत्री? मातोश्रीच्या बाहेर पडत नाही,” अशी टीका राणे यांनी केली. “जनतेत जायला पाहिजे, प्रश्न काय, अडचणी काय, काय केल्याने बेकारी जाईल यावर विचार केला पाहिजे,” असं नारायण राणे म्हणाले आहेत.

मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

मातोश्रीचं परिवर्तन झालं एकाचे दोन बंगले झाले

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. मग मराठी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन का होऊ शकलं नाही? मोतश्रीचं परिवर्तन झालं. एकाचे दोन बंगले झाले. मराठी माणसाच्या जीवनामध्ये काहीही फरक नाही. आजही मराठी तरुणांमध्ये बेकारी आहे. आजही शिवसैनिकांमध्ये बेकारी आहे. आजही शिवसैनिक घरी जातो तेव्हा चुल पेटली की नाही, आईने काही शिजवलं असेल की नाही, ही चिंता असते. त्यालाही वेळ का आली?” असा सवाल नारायण राणे यांनी केला.३२ वर्षांत मुंबई बकाल करून टाकली. किती माणसं मुंबईत कोरोनामुळे गेले, कुणामुळे? औषधामध्ये देखील यांनी पैसे खाल्ले आहेत. शिवसेनेने अशी वेळ आणू नये की कसे पैसे खाल्ले हे मी लोकांसमोर उघड करीन. जनतेचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवा आणि मग काय करायचं ते करा,” असं राणेंनी म्हटलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जखमींना उपचारासाठी 30 हजार खर्च राज्यसरकार देणार

News Desk

नरेंद्र पाटलांनी काढला देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा टॅटू !

News Desk

‘मुंबई, महाराष्ट्रानं अनेक लोकांना धनवान केलंय’, राऊतांचा विरोधकांना टोला

News Desk